पुणे : ‘गाव समृद्ध तर देश समृद्ध ह्या महात्मा गांधींच्या तत्वावर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार कार्यरत असून, ‘सांसद आदर्श ग्राम योजने’च्या माध्यमातून गावांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत’, असे प्रतिपादन खासदार अनिल शिरोळे यांनी वडगाव शिंदे येथे केले.
शनिवारी येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्राम स्वराज्य अभियान कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी भाजप चिटणीस महेंद्र गलांडे, विनीत वाजपेयी, वैभव शिंदे, मोहन मातेरे, तानाजी लोखंडे, रमेश काकडे, कमल गव्हाणे, ज्योती परिहार, ग्रामपंचायत सदस्य, तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, तसेच उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये सुकन्या समृद्धी, जन धन योजना प्रमाणपत्र वाटप, जिल्हा ग्रामीण केंद्र मार्फत १२ बचत गटांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचे अर्थसाह्य, पशुसंवर्धन विभाग मार्फत बियाणे, कडबाकुट्टी शाळांना शिक्षणोपयोगी साहित्य, अंगणवाडी केंद्रांना सतरंजी वाटप करण्यात आले.